धर्म आणि संस्कृती

धर्म आणि संस्कृती 
या भुतलावर परमेश्वर अनेक रूपात वावरत असतो. आपल्याला त्याचे जे रूप भावते त्या रूपात त्याला स्विकारावे. प्रत्येक वेळी जरूरी नाही कि तो देव देवतांच्याच रूपात असेल. जीथे गरज असते तिथे मदत करणाऱ्याच्या रूपातही तो असतोच की..! आपण काय मानतो यावर परमेश्वराचे स्वरूप अवलंबुन असते. मानला तर देव नाहीतर दगड. म्हणून प्रत्येकासाठी तो दगड असू शकत नाही. आपले मन हे सर्वशक्तीमान शक्ती आहे. देव असणं नसणं ही हे मनच ठरवतं. देव देवतांची अनेक रूपे आपण हजारो वर्षां पासून मानत आलो आहोत. आपल्या देशाच्या धर्म संस्कृतीचा पाया ही या रूपांवरच अवलंबुन आहे. अलिकडच्या काळात समाज खुपच प्रगत झाला आहे. या समाजाला धर्म संस्कृती यांच्याशी काहीच देणे घेणे नाही. मी किती पुढारलेलो आहे हे मिरवण्यातच तो धन्यता मानत आहे. धर्म आणि संस्कृती मध्ये काळाप्रमाणे बदल होणे आवश्यक आहे. ते जर झाले नाहीत तर तो समाज कट्टर वादी होतो आणि असा समाज पुढे आत्मघातकी होतो. काही लोक धर्म निरपेक्ष म्हणून मिरवतात पण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात ते धर्माशिवाय राहूच शकत नाही. आपला देश ही धर्म निरपेक्ष देश म्हणून शेखी मिरवत असतो पण अशी कुठली गोष्ट आहे कि धर्म आणि जाती शिवाय होते? मी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा हे जगासमोर मोठ्या अभिमानाने मांडणारे आपण स्वतःला धर्म निरपेक्ष समजतो. प्रत्येक जण माझा धर्म कसा श्रेष्ठ हे समजावून सांगतानाच तुझा धर्म कसा वाईट हे सांगताना दिसत आहेत.
जगातल्या प्रत्येक समाजाचा पाया हा धर्म हाच आहे. मग तो कुठलाही असो. धर्माच्या नावावर समाज एकसंध होतो पण आधुनिक समाजात या गोष्टीचा फायदा करून घेण्याऐवजी एकमेकांची माथी भडकविण्याचे काम होताना दिसत आहे. हिंदू धर्म संस्कृती ही निसर्गातील बदलांवर आधारित आहे. प्रत्येक महीन्यात निसर्गात वेगवेगळे बदल होत असतात.ऋतूमाना प्रमाणे अनेक स्थित्यंतरे होत असतात. निसर्गात होणाऱ्या प्रत्येक बदलाचे स्वागत केवळ हिंदू धर्म संस्कृती मध्ये आहे. पण या संस्कृती ला मुळ धर्माचे स्वरूप आणून धर्म संस्कृती बदनाम करण्याचे काम होताना दिसत आहे.
                              ----- ✍जयेश अ. माधव
                             jayeshmadhav.blogspot.com